राज्यात महाविकास आघाडी सरकार सुरु असतांना ते पाडून भाजपा सोबत जुळवून घेतलेल्या बंडखोर 39 आमदारांची अवस्था घर के ना घाट के अशी दिसत आहे. कारण त्यांना शिंदे-फडणवीस सरकार मध्ये आपल्यालाच मोठे मंत्रिपद मिळणार अशी आशा प्रत्येक बंडखोर आमदारांना आहे. त्यासाठी अनेकांनी आपापल्यापरीने शक्ती प्रदर्शनही केले. मात्र, नवे सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. बुधवारी ते अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते, तिथे ते भाजपच्या हायकमांडला भेटू भेटणार होते. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी दौरा रद्द केला. मात्र, यामागचे कारण त्यांनी दिलेले नाही.
येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते, मात्र दिल्ली दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर सट्टा बाजार पुन्हा तापला आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्या समीकरणाचीही लोक आता चर्चा करू लागले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकवेळा दिल्लीला गेले आहेत. बहुतांश बैठकांनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तसेच त्यांचा शपथविधी सोहळा होऊन बरेच दिवस झाले आहेत. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येक वेळी शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
दरम्यान, राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने विरोधकांनीही टीका केली आहे. मुसळधार पावसाने विदर्भ-मराठवाड्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. मंत्रिपरिषदेचा विस्तार न झाल्यामुळे एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. त्याचबरोबर सरकारकडून मदत मिळत नसल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. तसेच राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनही अद्याप झालेले नाही.