महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणावर जोरदार निशाणा साधला, ज्यात ते म्हणाले होते की, जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून काढून टाकले तर राज्यात पैसाही उरणार नाही आणि मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही. मराठीत एक पोस्ट शेअर करत राज ठाकरेंनी ‘मराठी माणसाला डिवचू नका’ असे कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर त्यावर बोलू नका, असे राज ठाकरे म्हणाले.
‘आपल्याला इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. त्यामुळे आपल्याबद्दल बोलताना लोक कचरतात. परंतु आपल्या वक्तव्याने जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील जमीन आणि मन मशागत करुन ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?’, असा सवालही राज ठाकरेंनी राज्यपालांना विचारला आहे.
‘उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आपल्याता आत्ता सांगतो’. अशा आशयाचं पत्र राज ठारेंनी राज्यपालांना लिहिलं आहे.
अंधेरी, मुंबई येथे एका चौकाला स्वर्गीय शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात राज्यपालांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बीएस कोश्यारी हे बोलताना ऐकू येतात, “मी लोकांना कधी कधी सांगतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले, तर तुमच्याकडे एकही पैसा उरणार नाही.”
राज्यपालांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं हे वक्तव्य राज्याचा अपमान करणारं असून याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.