सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे
ज्या गांधी कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान दिलं त्या कुटुंबातील एका स्त्रीला केवळ राजकारणाच्या देशापोटी त्रास दिला जातो, शिवाय खोट्या-नाट्या केसेस दाखल केल्या जातात हे लोकशाहीला गालबोट लावणारे आहे .अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली आहे.
आज सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयश्रीताई पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन ताई मोहिते, सिकंदर जमादार, जितेश भैया कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, मयूर पाटील, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.