राहुल मेस्त्री…
निपाणी मतदारसंघात विकासकामे राबवण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींचा आहे. पण विकासकामे राबवताना राजकीय हेतू ठेवत केवळ आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्व देत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामे अडवली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घेताना मंत्र्यांचे पत्र घेऊन येण्यास अधिकारी सांगत आहेत. केवळ राजकारणातून शेतकऱ्यांची कामे थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास मंत्री, खासदारांच्या घरा समोर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
गुरुवारी शेतकरी हुतात्मा दिना निमित्त निपाणीत रयत संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राजू पोवार बोलत होते. प्रारंभी येथील आंदोलन नगरातील हुतात्मा स्मारक येथे तंबाखू आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार , राजू पोवार यांच्या हस्ते हुतात्मा शेतकरी स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रॅलीने येऊन धर्मवीर संभाजीराजे चौकात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मानवी साखळी आंदोलन करत विविध घोषणा दिल्या. तेथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राजू पोवार म्हणाले, ढोणेवाडी शाळेतील अनुष्का सदाशिव भेंडे या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण आंदोलन केले. पण मंत्र्यांनी मात्र केवळ ५ लाखांचा धनादेश देत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. हिंमत असेल तर राज्य सरकारकडून ५० लाखांची भरपाई मिळवून दिल्यास लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करू. महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्व्हे चुकीचा झाला असून याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्याला कोणतीही जात, धर्म नसून केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांची कामे थांबवली जात असल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून देण्यात आले. त्यामध्ये लॉकडाऊन काळातील शेतकऱ्यांचे घरफाळा, पाणीपट्टी व विज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना २४ तास शेतीची वीज मिळावी, ऊसाला पाच हजार रुपये प्रति टन भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनी निःपक्षपातीपणे मिळाव्यात, साखर कारखान्याच्या सभासदांना प्रत्येकी १०० किलो साखर मिळालीच पाहिजे यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी रमेश पाटील यांची संघटनेच्या ग्रामीण भाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या.
मोर्चामध्ये उमेश भारमल भगवंत गायकवाड, सर्जेराव हेगडे,संजय पोवार, कलगोंडा कोटगे, नामदेव साळुंखे, बाबासाहेब पाटील, विजय गुरव, बाळकृष्ण पाटील, सुभाष देवर्षी, विवेक जनवाडे, हालप्पा ढवणे, बबन जामदार, रमेश मोरे, पवन माने, वैभव कुंभार, बाळू साळुंखे, सदाशिव शेटके, अशोक कुंभार, हरी जाधव, नाना कुंभार,माणिक कांबळे, रामगोंडा पाटील, रवींद्र चेंडके, आर. वाय. पाटील यांच्यासह निपाणी तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.