Thursday, March 28, 2024
Homeकृषीसोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा २४ नोव्हेंबरला...

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा २४ नोव्हेंबरला मुंबईला हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात घेणार जलसमाधी…रविकांत तुपकरांची घोषणा!

Share

रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे सरकारला आणखी ८ दिवसांचा अल्टीमेटम! म्हणाले, जीव गेला तरी मागे हटणार नाही…

बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे झालेला एल्गार मोर्चा रेकॉर्डब्रेक ठरला. या मोर्चाने बुलडाण्यातील गर्दीचे आतापर्यंतचे सारेच रेकॉर्ड मोडीत काढले. सोयाबीनला साठेआठ हजार तर कापसाला साडेबारा हजार रुपये भाव द्या. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी रविकांत तुपकरांनी सरकारला ८ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता.

८ दिवसानंतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू असा इशारा तुपकरांनी भाषणात दिला होता. दरम्यान ,आज १६ नोव्हेंबरला रविकांत तुपकरांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे. परतीच्या पावसाने सध्या रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय खा. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्टयात आहे.

शेतकऱ्यांच्या रब्बीच्या कामांवर व भारत जोडो यात्रेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून तुपकरांनी मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला आणखी ८ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मात्र ८ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर हजारो शेतकऱ्यांना सोबत २४ नोव्हेंबरला मुंबईतील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात भव्य एल्गार मोर्चा निघाला होता. रविकांत तुपकरांनी गावोगावी फिरून घेतलेल्या सभा, सोयाबीन कापसाच्या प्रश्नांवर केलेली जनजागृती याचा परिणाम म्हणून हा एल्गार मोर्चा रेकॉडब्रेक ठरला होता. यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

मागण्या मान्य न झाल्यास रक्ताचे पाट वाहतील मात्र महाराष्ट्रभर आंदोलन पेटवूच असा खणखणीत इशारा तुपकरांनी दिला होता. त्यामुळे आता तुपकर कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. दरम्यान आज, १६ नोव्हेंबरला तुपकरांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे.

२३ नोव्हेंबरला मुंबईकडे कुच..

२२ नोव्हेंबर पर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. अन्यथा २३ नोव्हेंबरला सोयाबीन कापूस उत्पादक पट्टयातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे कूच करू, २४ नोव्हेंबरला गिरगाव चौपाटी परिसरातील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात हजारो शेतकरी जलसमाधी घेतील असा इशारा तुपकरांनी दिला आहे.

अतिवृष्टीने खचलेला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठयावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दररोज वाढ होत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाचे काही देणे घेणे नाही. सरकारला आमचे मुडदेच हवे असतील तर आता सरकारच्या दारातच आमचे मुडदे पडतील, आता जीव गेला तरी मागे हटणार नाही असेही रविकांत तुपकरांनी म्हटले आहे.

या आहेत मागण्या..!

उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या सूत्राप्रमाणे सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार तर कापसाला दिड हजार रुपये भाव द्या. सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा. खाद्यतेलावर ३० टक्के आयात शुल्क लावा.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: