Wednesday, April 24, 2024
Homeराज्यरविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस…तुपकर मात्र जलसमाधी आंदोलनावर ठाम...

रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस…तुपकर मात्र जलसमाधी आंदोलनावर ठाम…

Share

बुलढाणा : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे. दिलेल्या इशारानुसार आज 23 नोव्हेंबर रोजी शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झाले आहेत.

या आंदोलनासंदर्भात यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली होती,परंतु अशा कितीही नोटीस आल्या तरी आता माघार घेणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर पण शेतकऱ्यांचा हा लढा थांबणार नाही, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांची फौज घेऊन ते मुंबईकडे कुच करत आहेत.

दरम्यान आता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील तुपकरांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये असे या नोटीस मध्ये नमूद आहे.

बुलढाणा पोलिसांनंतर मुंबई पोलिसांनी देखील नोटीस दिली असून राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनची नोटीस आली तरी आता ही शेतकऱ्यांची फौज मागे हटणार नाही. पोलिसांनी अडवा अडवीचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा आक्रमक आणि गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला असून ही फौज आता वेगाने मुंबईकडे मार्गक्रमण करत आहे.

ठिकठिकाणी स्वागत

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघालेल्या वाहनांच्या ताफ्यांचे ठिकठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. या शेतकरी यात्रेचे स्वागत करुन प्रत्येक ठिकाणाहून दोन-चार वाहने या यात्रेत सहभागी होत होते, सुमारे दोनशे वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना वेगळेच चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत होते. मार्गातील प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी, मायमाऊल्यांनी या यात्रेचे स्वागत करुन यशस्वी भव असा आशिर्वाद देखील दिला.

चित्रपटात शोभावे असे दृष्य

एकामागोमाग शेकडो वाहनांचा ताफा, नारेबाजी असे दृश्य केवळ चित्रपटात आणि खासकरुन साऊथच्या चित्रपटात पहावयास मिळते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलनासाठी शेकडो वाहनांनी हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे रवाना झाली आहे. रस्त्यावरुन एकामागे एक अशा शेकडो वाहनांची ही रांग पाहून चित्रपटातील दृश्य पाहत आहे की काय? असाच काही वेळ संभ्रम होतो.

शेतात बसून खाल्ल्या घरच्या भाकरी

अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे रवाना झाली आहे. शेकडो वाहनांचा ताफा मुंबईकडे आगे कूच करत असून मार्गावर ठिकठिकाणी रविकांत तुपकर व या शेतकरी यात्रेचे स्वागत केले जात आहे. दरम्यान या यात्रेतील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या घरून बांधून आणलेल्या भाजी भाकरीची न्याहरी एका शेतात केली. घरून पालवात बांधून आणलेली ठेचा भाकर, चटणी – पोळी आणि घरचे अन्न खाऊन ही यात्रा पुन्हा मार्गस्थ झाली आहे.

आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी घरची भाजी भाकर बांधून आंदोलनाला निघाली आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जाण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे शेतकऱ्यांच्या या फौजेमुळे प्रशासनात धडकी भरली असून मुंबई पोलिसांनी रविकांत पाठवून आंदोलन करण्याची विनंती केली आहे परंतु आता माघार नाही असा निर्धार करून पालवातील भाजी भाकर खाऊन शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे आगे कूच करत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: