अमरावती, दि. २५ जुलै २०२२ :- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने परवा दिनांक २७ जुलै रोजी “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन अमरावती आणि दुपारी ४ वाजता परशूराम भवन मोर्शी येथे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत मागील ८ वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांचा जागर करण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन २०४७ पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजनाचा जागरही यावेळेस करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात केंद्र व राज्य शासन योजनेचे लाभधारक प्रत्यक्ष आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या ७ चित्रफीती दाखविण्यात येणार आहे. यात युनिव्हर्सल हाऊसहोल्ड इलेक्ट्रीफीकेशन, व्हीलेज इलेक्ट्रीफीकेशन, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्ट्रेंथींग, कॅपॅसिटी या चित्रफीतीचा समावेश आहे.ऊर्जा विकासावर आधारीत नुक्कड नाटक आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी लोकप्रतिनीधी व प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले असून नागरिकांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.