Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीसंजय आठवले खंडणीखोर?...महाव्हाईसचा उपयोग खंडणी मागण्यासाठी...आदिवासी भाडेपट्टा चौकशीत स्टोन क्रशर धारक संतोष...

संजय आठवले खंडणीखोर?…महाव्हाईसचा उपयोग खंडणी मागण्यासाठी…आदिवासी भाडेपट्टा चौकशीत स्टोन क्रशर धारक संतोष शेंडेचा आरोप…

Share

संजय आठवले आकोट

स्टोन क्रशर धारक संतोष शेंडे याने आदिवासी जमिनीचा भाडेपट्टा केल्याप्रकरणी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेशाने तहसीलदार आकोट हे करीत असलेल्या चौकशीमध्ये संजय आठवले हा इसम खंडणीखोर असून महाव्हाईस न्यूज चा उपयोग तो खंडणी मागणीसाठी करीत असल्याचा लिखित जबाब स्टोन क्रशर धारक संतोष शेंडे याने तहसीलदार आकोट यांचेकडे दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्यादिवशी संजय आठवले खंडणीखोर आहे की संतोष शेंडे प्रामाणिक आहे याचा उलगडा होणार आहे.

अकोट तालुक्यातील मौजे गाजीपुर येथील शेत सर्वे क्रमांक ३२/१ या आदिवासी शेताचा स्टोन क्रशर धारक संतोष शेंडे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांचे पूर्वपरवानगी विना भाडेपट्टा केल्याचे वृत्त महा व्हाईस न्यूजने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दाखल घेऊन अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या भाडेपट्ट्याबाबत चौकशी करण्याचे आदेश आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिले होते.त्यांनी याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून आकोट तहसीलदार यांना नियुक्त केले. या वृत्ताचे लेखक संजय आठवले यांनाच या प्रकरणात तक्रारकर्ता म्हणून मानण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार आकोट यांनी सुनावणी सुरू केली आहे. स्टोन क्रशरधारक संतोष शेंडे ह्याने केलेल्या आदिवासी भाडेपट्ट्या संदर्भात संजय आठवले यांनी सक्षम पुरावे तहसीलदार आकोट यांचे समक्ष सादर केले आहेत. त्यासोबतच दुय्यम निबंधक (मुद्रांक शुल्क) आकोट, मुद्रांक विक्रेता संजय शेगोकार आकोट, तसेच उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल महावितरण आकोट यांचेही लिखित बयान मागविण्याची विनंती संजय आठवले यांनी केली आहे. परंतु या सुनावणी दरम्यान आकोट तहसीलदार निलेश मडके यांचे वडिलांचे देहावसान झाल्याने ते दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.

तहसीलदार मडके हे दीर्घ रजेवर जाण्यापूर्वीच्या सुनावणीमध्ये प्रतिवादी संतोष शेंडे यांनी आपला लिखित जबाब प्रकरणात दाखल केला आहे. या जबाबात त्याने संजय आठवले हा खंडणीखोर असून महा व्हाईस न्यूज चा उपयोग खंडणी मागणी करिता करीत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या जबाबात त्याने पुढे म्हटले आहे की, “अर्जदार ह्याने गैरअर्जदार यांच्या विरुद्ध दुष्ट हेतूने अर्ज केलेला आहे.अर्जदार हा काही एक कारण नसताना त्याला मिळालेल्या वार्ताहर या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्वरूपात पिवळणूक करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सदरचा अर्ज. अर्जदार हा महाव्हॉइस या चॅनलचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी व इतर लोकांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी करतो. त्यामुळे अर्जदार याने महाव्हाईस चॅनलवर प्रसारित केलेल्या बातम्यांचे अवलोकन केले असता सर्व सामान्य माणसाची आर्थिक पिळवणूक होण्याचे उद्देशाने ह्या बातम्या प्रसारित केलेल्या दिसतात. त्यामुळे आज रोजी आकोट येथे सदर अर्जदार याचा सर्रास हैदोस असून तो एनकेन प्रकारेन स्वतःचा आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून सदर चॅनलवर बातम्या प्रसारित करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अर्जदाराच्या महाव्हाईस या चॅनलच्या बातम्यांची सखोल चौकशी करून अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी”.

आपल्या ह्या कथनाचे पुष्ट्यर्थ संतोष शेंडे याने स्वतःबाबत तथा संतोष चांडक बाबत महाव्हॉइसने प्रकाशित केलेल्या वृत्तांची कात्रणे पुरावा म्हणून सादर केलेली आहेत. या वृत्तांचे अवलोकन केले असता, त्यामध्ये संतोष शेंडे व संतोष चांडक यांच्या अवैध कारनाम्यांचे पुराव्यानिशी वर्णन केलेले आढळून येते. तक्रारीच्या नादात ही कात्रणे आपल्याच विरोधातील पुरावा ठरतात याचेही भान इमानदार संतोष शेंडेला राहिले नाही. येथे उल्लेखनीय आहे की, संतोष शेंडे ह्या प्रामाणिक सज्जनाने बरोबर एक वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी एका पितपत्रकाराने आपल्याला खंडणी मागितल्याची तक्रार आकोट शहर पोलीस ठाणे येथे नोंदविली होती. त्या पित पत्रकाराला दोन इसमांच्या मध्यस्थीने तडजोड करून आपण साठ हजार रुपयांची खंडणी दिल्याची कबुली संतोष शेंडे याने या तक्रारीत दिली आहे. परंतु त्यावर त्या पित पत्रकाराने आणखी चाळीस हजार रुपये मागितल्याने संतोष शेंडे ह्याने त्याचे विरोधात तक्रार दाखल केली.

त्यामुळे संतोष शेंडे हा सचोटीचा व्यवसायिक असल्यावरही त्या पीत पत्रकाराने त्याला खंडणी का मागितली? दोन इसमांच्या मध्यस्थीने तडजोड करून त्या पित पत्रकाराला त्याने साठ हजार रुपये का दिले? आपल्या धंद्यात कोणतीही खोट नसताना त्याने त्या पितपत्रकाराशी तडजोड का केली? ही खंडणी देताना लाच प्रतिबंधक विभागाचा सापळा का रचला नाही? ही खंडणी दिल्यानंतर संतोष शेंडे बराच काळ शांत का बसला? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा शोध घेतला असता ध्यानात येते की, संतोष शेंडेच्या धंद्यात काळे बेरे असल्याने त्याने तडजोड करून खंडणी दिली. त्यामुळेच तो शांत बसला. त्याची ही शांतता त्याला खंडणी देणे मंजूर असल्याचे द्योतक आहे. त्या पितपत्रकाराने आणखी ४० हजार रुपये मागितले नसते तर संतोष शेंडे शांतच राहिला असता. परंतु ही अधिकची मागणी झाल्याने शेंडेने त्या पत्रकाराचे विरोधात तक्रार दाखल केली. यावरून हे लक्षात येते की संतोष शेंडे याने लाच दिली आहे. ही लाच देताना मध्यस्थी व तडजोड करणारे ते दोघे इसम या घटनेचे साक्षीदार आहेत. आणि कायदा म्हणतो की, ज्याप्रमाणे लाच घेणे हा अपराध आहे, त्याचप्रमाणे लाच देणे हा सुद्धा अपराध आहे. म्हणजेच संतोष शेंडेने लाच देण्याचा अपराध केला आहे.

त्या पीतपत्रकाराने शेंडेला धमकी दिली, त्या पोटी लाच घेतली, वरून अधिकची मागणीही केली. त्यामुळे त्याबाबत शेंडेने तक्रार करणे स्वाभाविक ठरू शकते. मात्र संजय आठवले याने ना शेंडेला धमकी दिली, ना लाच मागितली, ना लाच घेतली. तरीही शेंडेने तहसीलदार आकोट यांचे समक्ष संजय आठवले हा खंडणीखोर असल्याचा लिखित आरोप केला आहे. त्यामुळे जर असे असेल तर संतोष शेंडे याने त्या पितपत्रकारासारखीच संजय आठवले याची अद्याप तक्रार का दाखल केली नाही? लाच प्रतिबंधक विभागाचा सापळा रचून त्याला अटक का करविली नाही? आणि तसे नसेल तर संजय आठवले हा खंडणीखोर आहे हा आरोप कशाचे आधारावर केला? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्या सुनावणीत या प्रश्नांची उकल केली जाणार आहे. आणि त्यानंतर संजय आठवले खंडणीखोर आहे की संतोष शेंडे हा अवैध पद्धतीने आदिवासी भाडेपट्टा केल्या प्रकरणी अपराधी आहे, ते समोर येणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: