अमरावती ( प्रतिनिधी ) : वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील गौणखनीज शासनाचा दर दिवशी करोडो रुपयाचा महसूल बुडवून रेल्वे कंत्राटदार व संबंधीत महसूल विभागाचे कर्मचारी यांनी राजरोसपणे संगनमताने खुल्या बाजारात विकला त्या संबंधात रितसर पुराव्यासह अमोल कोमावार यांनी तक्रार करून पकडून दिल्याने तक्रारदार / पत्रकार अमोल कोमावार यांच्यावर उलट दबाव तंत्राचा वापर करून तसेच प्रकरण दडपण्यासाठी प्रचंड दडपण आणून त्याच्या जिवानीशी खेळण्याचा प्रकार यवतमाळ येथे घडला असून ह्या प्रकारणातील दोषींवर सक्त , कठोर त्वरीत कारवाईसाठी ” जिंकु किंवा मरु ” राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघांने दिला आहे .
सविस्तर वृत्त असे की , वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाचे काम गेल्या ४ वर्षापासून चालु आहे . ह्या प्रकल्पाचे कंत्राट RBR HC – JV ह्या कंपन्यांना देण्यात आले आणि त्या कंपन्यांनी थोड्या थोड्या अंतरावरील कामे उपकंत्राटदार यांना वाटून देवून स्वतः सुद्धा काम करीत होते . त्यांच्या कमामध्ये प्रचंड अनियमितता असल्याकारणाने या संबंधीच्या बऱ्याच तक्रारी संबंधीत खात्याला करण्यात आल्या एवढेच नाही तर ह्यांच्या कामाच्या बाबतीतील अनियमितता गैरप्रकार हा मा . खासदार भावनाताई गवळी यांनी लोकसभेत सुद्धा मांडला त्यावर कारवाई होऊन मुख्य कंत्राटदाराकडून करोडो रुपयाचा दंड सुद्धा भरल्या गेला आणि त्याची कसर काढण्यासाठी कंत्राटदारांनी राज्य सरकारच्या महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून चक्क करोडो रुपयाचा रेल्वे उत्खननातील गौणखनीज खुल्या बाजारात विकला .
एका बाजुने रेल्वे कंत्राटदार / उपकंत्राटदार राज्य शासनाचे संबंधीत खात्याचे भ्रष्ट अधिकारी यांनी खुले आम राजरोसपणे , गुंडगिरी करून कायद्याला न जुमानता करोडो रुपयाचा गौणखनीज खुलेआम विकुन करोडो रुपये कमविण्याचा सपाटाच लावला तर दुसऱ्या बाजूने तक्रारदार / पत्रकार याने कायद्याचे पालन करीत लोकशाही मार्गाने तक्रारी , उपोषण करून दोषींच्या भ्रष्टाचाराची मालिकाच उघडकीस आणली त्यामुळे चिडून जावून दोषींनी प्रकरण दडपण्यासाठी पत्रकारावर वेगवेगळ्या मार्गाने जीवघेणे प्रयत्न सुरु केले. थोडक्यात म्हणजे त्याचा अभिमन्यु केला दैव व कर्म बलवत्तर म्हणून जिव वाचला.परंतू ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच चोप देण्यासाठी , त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांच्यावर सक्त कठोर कारवाईसाठी व रेल्वे कंत्राटदार / उपकंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईसाठी मा . पोलीस महानिरीक्षक, अमरावती तसेच मा.विभागीय आयुत , महसूल विभाग , अमरावती यांना निवेदनासह फक्त कारवाईसाठी १५ दिवसाचा अवधी अल्टीमेटम देण्यात आला व त्यानंतर नैशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट, महाराष्ट्र व ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अनेक वेगवेगळ्या पत्रकार संघटना , सामाजिक संघटना , राजकीय संघटना यांच्या पाठींब्याने संपूर्ण राज्यभर निदर्शने व ” जिंकु किंवा मरु ” आंदोलनाचे आयोजन केले आहे.
या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट , महाराष्ट्र हे अध्यक्ष मा . श्री . उदय जोशी ( मुंबई ) व ग्रामीण पत्रकार संघ चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गजाननराव वाघमारे ( अकोला ) हे आहेत . तसेच याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा या संपूर्ण विषयावर निवेदनाद्वारे संवाद साधून सविस्तर माहिती दिली असल्याचे सुद्धा विश्वसनीय सुत्रांकडून ऐकण्यात येत आहे . संपूर्ण राज्यात यवतमाळ येथील गौणखनीज विभागाचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार व त्याचे परिणाम आता खुप मोठा चर्चेचा विषय ठरत असून • राजकीय वर्तुळात खास करून शिवसेनेत ह्या विषयाबाबत उलट सुलट चर्चेला उत आला आहे . परंतू या राज्यव्यापी आंदोलनामुळे यवतमाळ मधील सत्ताकारण बदलेल हे निश्चित झाले आहे .
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय संघटक गोपाल नारे, जिल्हा अध्यक्ष सादिक शाह महेबुब शाह, कार्याध्यक्ष प्रविण झोलेकर, जिल्हा उपाध्यक्ष विक्की बाभूळकर सह आदी उपस्थीत होते.