सांगली प्रतिनिधी — ज्योती मोरे
सांगली शहरातील मारुती चौकात असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला 31 जुलै 2022 रोजी साठ वर्षे पूर्ण होणार आहेत त्या निमित्ताने रॉयल्स युथ फाऊंडेशन आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सदर पुतळ्यास पाच नद्यांचे तसेच पाच किल्ल्यावरील पाणी व दुधाचा महाअभिषेक घालण्यात येणार आहे. शिवाय 60 किलो लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी दिली आहे.
साठ वर्षांपूर्वी 31 जुलै 1962 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. प्रसिद्ध शिल्पकार आर टी शिरगावकर यांनी बनवलेल्या हा पुतळा सांगलीकरांसाठी तीर्थस्थळ बनलेला आहे. गेल्या साठ वर्षातील सामाजिक राजकीय, सांस्कृतिक घटनांचा तसेच कृष्णा नदीला आलेल्या पूरांचा साक्षीदार म्हणून आजही हा पुतळा दिमाखात उभा आहे.
सदर कार्यक्रमासाठी समस्त सांगलीकर शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऋषिकेश पाटील यांनी केले आहे.