सांगली – ज्योती मोरे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजादी गौरव पदयात्रा व नवसंकल्प शिबिराचे आयोजन ९ ते १५ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान जोरदारपणे करण्याचा निर्धार सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
काँग्रेस कमिटीत झालेल्या या बैठकीला शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे प्रभारी संजय बालगुडे, सहप्रभारी अभिषेक साळुंखे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ही गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय झाला. ९ ऑगस्टला गौरवयात्रेची सुरुवात होईल. त्यादिवशी पलूस आणि कडेगाव हे दोन तालुके तसेच १० तारखेला तासगाव आणि कवठेमहांकाळ, ११ ला आटपाडी आणि खानापूर, १२ ला शिराळा आणि वाळव्याचा काही भाग, १३ ला वाळवा तालुक्यात इस्लामपूर आणि आष्टा, १४ ला जत आणि उमदी तर १५ रोजी गौरवयात्रेचा समारोप होईल. यादिवशी सांगली ते मिरज शहरादरम्यान पदयात्रा होणार आहे.
यात्रेमध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या घोषणा द्याव्यात अशा सूचना करण्यात आल्या. यात्रेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाने फार मोठे काम केले आहे. काँग्रेसमुळे या देशाची प्रगती झाली आहे. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहात पदयात्रा काढावी आणि नवा संकल्प जनतेपर्यंत पोहोचवावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बैठकीला सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय मेंढे, जिल्हा परिषदेचे गटनेते जितेंद्र पाटील, अनेक नगरसेवक, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, ब्लॉकचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.